आज खूप दिवसांनी शब्दांना पालवी फुटली
शब्दकळ्या शब्दफुले.. शब्द शब्द वेचत सुटली
शब्द अधीर शब्द बधीर शब्द मुळी सुचत नव्हते
सुचत होते शब्द जे.. ते मनापासून रुचत नव्हते
अखेर शब्द विरुन गेले ओठामागे काळोखात
पुन्हा सुरु पानझड मनामध्ये आतल्याआत
असंच होतं जेव्हा जेव्हा तुझी माझी भेट होते
शब्दामागून शब्द येतात वेळ मात्रं निघून जाते
सांगायचं असतं तुला तेच नेमकं राहून जातं
शब्दांना पूर येतो.. सुचलेलं वाहून जातं
शब्दांच्या ओघात असं.. शब्दांचं हसं होतं
काय सांगू कसं सांगू? कित्ती सांगू असं होतं
म्हणून सांगते.. ऐकशील का???
माझ्या एका शब्दाखातर स्वप्नामध्ये येशील का
मागायचं आहे तेच.. न मागता देशील का??
म्हणजे मन मोकळं होईल शब्द अडून राहणार नाहीत
तुझ्या एका शब्दासाठी.. तुझी वाट पाहणार नाहीत…!!!
No comments:
Post a Comment