घडले होते बरेच काही..
तरी नव्याने घडते आहे..
रोजच्याच त्या वाटेवरती..
पाऊल नकळत पडते आहे..
दिवस कालचा उगवून गेला..
रात्र पुन्हा मावळते आहे..
जुन्याच आशा.. नव्या उमेदी..
भविष्य चिंता छळते आहे..
गतकाळाच्या रम्य स्मृतींना..
पुन्हा उजाळा कशास देऊ..??
विसरु म्हणते झाले गेले..
चुकले तेव्हा कळते आहे..
भले जाहला उशीर थोडा..
वेळ जराशी निघून गेली..
अविचाराला सुधारण्याची.
नवीन संधी मिळते आहे..
म्हणून आता जगेन म्हणते..
व्यवहारी अन विरक्त होऊन..
आता कुठेसे आयुष्याशी..
सशक्त नाते जुळते आहे... !!!
No comments:
Post a Comment