
नव्हती जेव्हा तुझी नि माझी ओळख साधी..
संवादाची वृथा अपेक्षा प्रश्नाआधी..
तेव्हापासून खोल मनाच्या गाभार्याशी..
तुझ्या स्मृतींच्या सवे घ्यायची नित्य समाधी..
तेव्हापासून जडली बाधा आठवण्याची..
पुन्हा मनाला मागे मागे पाठवण्याची..
शब्दफुलांचे असंख्य झेले.. अनंत आशा..
मुठीत काही मिठीत थोडे साठवण्याची..
तेव्हापासून फ़ितुर झाले श्वास बिलंदर..
तेव्हापासून उरले नाही..दूरात अंतर..
शब्द लाघवी जुळले.. आणिक घडली कविता..
रुळू लागले ओठावरती..गीत परस्पर...
तू नजरेने सांग एकदा माझ्यासाठी
जुळतील का रे.. तुझ्या नि माझ्या रेशीमगाठी..
तुझेच व्हावे मीपण तेव्हा सर्वस्वाने..
विसरून माझे 'मी' पण अवघे तुझ्याच साठी..
असे घडावे तसे घडावे.. घडेल का रे?
माझ्यावाचून काही तुझेही अडेल का रे
तेव्हापासून त्या सरलेल्या.. क्षणाक्षणाला..
स्मरण्याचे हे वेड तुलाही जडेल का रे..??
काय खुळी मी विचारते बघ भलते सलते...
नाहीच काही तसे मलाही अचूक कळते..
उगीच वेड्या आशेवरती माझ्या नकळत..
अल्लड पाऊल पुन्हा पुन्हा त्या तिथेच वळते..
अपुल्यामधले किंतु परंतु सरतील जेव्हा..
जरतारीच्या रिक्त पोकळ्या भरतील तेव्हा..
उपचाराचे रूक्ष बोलणे सोड अन्यथा...
आठवणींचे हिशोब केवळ उरतील तेव्हा..
नकोच गुंता नात्यांचा ती व्यर्थ मुजोरी..
नकोस तोलू शब्दांमधले अर्थ दुहेरी..
मित्रत्वाची अवीट गोडी ओढ चिरंतन..
अखंड राहो पावित्र्याचा बंध रुपेरी..
तेव्हापासून असेच काही स्मरते.. झुरते..
नित्य उशाशी अश्रू.. आणिक मनात सल ते..
किती ठरवते विसरून सारे पुन्हा नव्याने..
जगण्याचा मी केविलवाणा प्रयत्न करते..
अखेर माझ्या नकळत मजला.. गुपित कळते..
शून्यामधल्या घरट्यासाठी वणवण फिरते..
तेव्हापासून... माझी प्रतिभा .... अलिप्त.... निश्चल..
म्हणून माझी कविता.. कायम अपूर्ण उरते............ !!!