Monday, January 28, 2008

कशाला ???


विसरायाचे आहे सारे स्मरु कशाला.. ??
आठवणींच्या रिक्त पोकळ्या.. भरु कशाला ..??

घडून गेले बरेच ... तरीही घडते आहे...
गतकाळाच्या सुप्त सावल्या... धरु कशाला..??

कळले जेव्हा चुकले.. तेव्हा शहाणी झाले..
व्यर्थ चुकांचे हिशोब पुन्हा.. करु कशाला..??

स्वैर मनाचे विचार आता.. जाणीन म्हणते..
चाकोरीतील सक्त बंधने.. धरु कशाला..??

आता कुठेशी धडपडते..मी जगण्यासाठी..
घटका घटका श्वास मोजुनी.. मरु कशाला..??

Tuesday, January 22, 2008

प्रवास...


नव्हते सवे कुणीही ... एकांतवास होता..
मी चालले तरीही .. तोही प्रवास होता..

होतास सोबतीला होऊन सावली तू..
तेव्हा कुठे कळ्यांच्या गात्री सुवास होता..

आता फुले कळ्यांची आहेत ओंजळीशी..
पण गंध वेचणारा तो ''तू'' हवास होता..

गंधातला बिलोरी तो स्पर्श आज नाही...
साराच प्राक्तनाचा.. फसवा आभास होता...

काटेच आज माझ्या वाटेत सांडलेले..
व्हावा सराव त्यांचा इतुका प्रयास होता...!!!!!!!

Monday, January 21, 2008

'' तेव्हापासून......''


नव्हती जेव्हा तुझी नि माझी ओळख साधी..
संवादाची वृथा अपेक्षा प्रश्नाआधी..
तेव्हापासून खोल मनाच्या गाभार्‍याशी..
तुझ्या स्मृतींच्या सवे घ्यायची नित्य समाधी..

तेव्हापासून जडली बाधा आठवण्याची..
पुन्हा मनाला मागे मागे पाठवण्याची..
शब्दफुलांचे असंख्य झेले.. अनंत आशा..
मुठीत काही मिठीत थोडे साठवण्याची..

तेव्हापासून फ़ितुर झाले श्वास बिलंदर..
तेव्हापासून उरले नाही..दूरात अंतर..
शब्द लाघवी जुळले.. आणिक घडली कविता..
रुळू लागले ओठावरती..गीत परस्पर...

तू नजरेने सांग एकदा माझ्यासाठी
जुळतील का रे.. तुझ्या नि माझ्या रेशीमगाठी..
तुझेच व्हावे मीपण तेव्हा सर्वस्वाने..
विसरून माझे 'मी' पण अवघे तुझ्याच साठी..

असे घडावे तसे घडावे.. घडेल का रे?
माझ्यावाचून काही तुझेही अडेल का रे
तेव्हापासून त्या सरलेल्या.. क्षणाक्षणाला..
स्मरण्याचे हे वेड तुलाही जडेल का रे..??

काय खुळी मी विचारते बघ भलते सलते...
नाहीच काही तसे मलाही अचूक कळते..
उगीच वेड्या आशेवरती माझ्या नकळत..
अल्लड पाऊल पुन्हा पुन्हा त्या तिथेच वळते..

अपुल्यामधले किंतु परंतु सरतील जेव्हा..
जरतारीच्या रिक्त पोकळ्या भरतील तेव्हा..
उपचाराचे रूक्ष बोलणे सोड अन्यथा...
आठवणींचे हिशोब केवळ उरतील तेव्हा..

नकोच गुंता नात्यांचा ती व्यर्थ मुजोरी..
नकोस तोलू शब्दांमधले अर्थ दुहेरी..
मित्रत्वाची अवीट गोडी ओढ चिरंतन..
अखंड राहो पावित्र्याचा बंध रुपेरी..

तेव्हापासून असेच काही स्मरते.. झुरते..
नित्य उशाशी अश्रू.. आणिक मनात सल ते..
किती ठरवते विसरून सारे पुन्हा नव्याने..
जगण्याचा मी केविलवाणा प्रयत्न करते..

अखेर माझ्या नकळत मजला.. गुपित कळते..
शून्यामधल्या घरट्यासाठी वणवण फिरते..
तेव्हापासून... माझी प्रतिभा .... अलिप्त.... निश्चल..
म्हणून माझी कविता.. कायम अपूर्ण उरते............ !!!

'' ध्येयं ...''


ठरव एकदा शांतंपणे
जगण्यामागचा हेतू काय..
दिशाहीन भटकायचं..
जगण्यासाठी ध्येयाशिवाय..??

अस्तित्वाची जाणीव काय..
सावलीसुद्धा करुन देते..
पण अंधाराच्या खोल गर्तेत
अंधाराची होऊन जाते..

अशावेळी दिव्यासारखं
फक्त एकदा जळून बघ..
तुझं स्वत्वं नक्की मिळेल
मागे-पुढे वळून बघ..

कुणीच नसतं कुणाचं
आपली आपण चालत रहा..
कर्तृत्वाच्या बळावरती
संकटांना झेलत रहा..

ठेच लागेल जखम होईल
वेळेसरशी भरुन येईल..
व्रण मागे ठेवून जाईल
त्याचीसुद्धा सवय होईल..

स्वत्:वरती विश्वास ठेव
खंबीरपणे पाऊल टाक..
निर्णयाशी ठाम हो
वास्तवाचं भान राख..

स्पर्धा कर वार्‍याशी
प्रवाहात ये.. सोडून काठ..
जमिनीवरती पाय रोवून
आकाशाची उंची गाठ..

ध्येयासक्त आशावाद
जेव्हा इतका दृढ होईल..
तुझ्या नकळत तुझं ध्येयं
तुझ्यासमोर उभं राहील..

जाणीवांना श्रेयं मिळेल
उणीवांना मिळेल न्याय..
म्हणून म्हणते ठरव एकदा
जगण्यामागचा हेतू काय..

दिशाहीन भटकू नकोस
जगताना ध्येयाशिवाय.... !!!!

''हल्ली ...''


हल्ली तुझं माझ्याशी
पूर्वीसारखं पटत नाही..
खोल मनात दाटून येतं
पण.. शब्द ओठी फुटत नाही..

भेट होते स्तब्ध मुकी
भाव मात्र उमटत नाही..
तुझ्या गप्प राहण्यामागचं
कोडं काही सुटत नाही..

निसटलेल्या क्षणांमधलं
वादळ पुन्हा उठत नाही..
आठवणींची झुळुकसुद्धा
श्वासामध्ये भेटत नाही..

पुन्हा पुन्हा पारायणं
तरी पापणी मिटत नाही..
सरलं सारं.. कळतय तरी
वाट पाहून विटत नाही..

तुझं नक्षत्रांचं देणं
काही केल्या फिटत नाही..
निदान या जन्मीतरी..
फिटेल असं वाटत नाही...!!

'' पहिल्या पावसात भिजताना...''


जलधारांचे तुषार झेलित
सुगंधासवे सजताना..
मृदा पांघरे हिरवा शालू
पहिल्या पावसात भिजताना...

ग्रीष्म ऋतूचा दाह सोसूनी
रणरण उन्हात शिजताना..
कणकण वेचे सुखद शहारा
पहिल्या पावसात भिजताना...

बीज तृणातील इवले नाजूक
थेंब शोषूनी रुजताना..
अंकुर बदले रोप होऊनी
पहिल्या पावसात भिजताना...

चिमणपाखरे भिरभिरणारी
किलबिलचिव कुजबुजताना..
थवा विखुरला दहा दिशांना
पहिल्या पावसात भिजताना...

गतवर्षीचा पहिला पाऊस
मनात अलगद निजताना..
आठवणींना फुले पिसारा
पहिल्या पावसात भिजताना... !!!

'' रात्र... ''


हल्ली रात्र मला फार जवळची वाटते.. !!
अंधाराने व्यापलेली..
काळोखात कोंडलेली..
पण.. तरीही..
असंख्य नक्षत्रांनी वलयांकीत..
म्हणूनच कदाचित..' ती ' मला ' माझी ' वाटते.. !!
किणकिणणारी कांकणं..क्वचितच इवल्याशा धक्यानेही..
खळकन फुटतात..
अगदी तस्संच.. एखाद्या रात्री..
नि:शब्द वेगाने..एखादंच नक्षत्र..
पृथ्वीच्या ओढीने.. आकाशातून झेपावतं..
आणि.. मी मात्र.. त्याच्या साक्षीने का होईना..
खोल आंतर मनातली एखादि तरी सुप्त इच्छा..
मनातल्या मनात त्याला बोलून दाखवते..
माझं नशीब त्याच्यावर सोपवून..
मी निश्चिंतपणे झोपी जाते.. !
पण त्याचंही दुर्दैव असं..की..
ज्या ओढीने त्यानं हा अंत्:कालाचा तेज:पुंज प्रवास केला..
त्याचाही शेवट केवळ मातीत मिसळून व्हावा.. ??
मग..
माझ्यापेक्षा ते नक्षत्रंच मला जास्त कमनशीबी वाटू लागतं...
निदान तेव्हातरी....
माझ्याइतकं नशीबवान या जगात कुणीच नसतं !!!
म्हणूनच माझं रात्रीशी जरा जास्तंच पटतं..
माझ्या नशीबाचं पुन्हा पुन्हा कोडकौतुक करण्यासाठी का होईना...
त्या रात्रीची मी वाट पाहते..
कदाचित........
म्हणूनच......
हल्ली रात्र मला फार जवळची वाटते.. !!!

कुणासाठी..


कुणासाठी इतकीही वेडी होऊ नकोस
की त्याची सवय होईल..
त्याच्या शिवाय जीणं भकास
दिवस कसा उदास जाईल..

इतकीही वेडी होऊ नकोस की
स्वत्वासून दूर जाशील..
केवळ त्याचाच विचार करुन
स्वत्:पासून पोरकी होशील..

इतकीही वेडी होऊ नकोस की
अपेक्षांचं होईल ओझं..
वेळीच आवर सावर स्वत्:ला
उरलं सुरलं अवसान तुझं..

शहाणी हो.. विसर सारं..
गुंतू नक्कोस.. चुक्कून पण..
चुकांमधून शिक थोडं..
चिंतू नकोस वेडे क्षण..!!!

"उपाशी...."


सिग्न्नलपाशी गाडी थांबली,की...कित्येक चिमुरडे हात.. त्यांच्या त्या केविलवाण्या नजरा..जीवाच्या आकांताने पुढे सरसावतात.
इतरांचं माहित नाही, पण.. मी स्वत्: मात्रं त्या कोवळ्या जीवांसाठी काहीच करु शकत नाही, हि सल सारखी टोचत राहते.
माझी हतबलता मी माझ्या काव्यात व्यक्तं करण्याचा प्रयत्न्नं केलाय!


"उपाशी...."

माझ्या अपेक्षा..
अपेक्षांचे ओझे..
ओझ्याखाली दबलेले..
दिवास्वप्न्नं माझे....
स्वप्न्नातला वारा..
वार्‍यातला श्वास..
श्वासातला स्पर्श..
स्पर्शातली आस..
कोवळासा जीव..
शरीर निर्जीव..
डोळ्यातून माझ्या..
पाझरते कीव..
त्या दोन हातांत..
दयेची याचना..
नजर हताश..
मनी विवंचना..
अनाथ एकटा..
लाचार पोरका..
आपुलासा वाटे..
तो जीव परका..
त्याच्या मुखी घास..
मी भरवावा..
भुकेचा वणवा..
त्याचा शमवावा..
हात माझा जावा..
माझ्या ताटापाशी..
पुन्हा तो हताश........
होते मी स्वत्: उपाशी...!!!!

"अस्तित्वाचा लढा..."


झिजले होते, झिजते आहे..
कोरड्या मायेत रुजते आहे,
झिजून सरल्या आयुष्याचे..
उरले क्षण मोजते आहे..!!

सोसत होते, सोसते आहे..
लाचार नशीब पोसते आहे,
सोसून भरल्या डोळ्यान्मधले..
दुबळे अश्रू पुसते आहे..!!

लढले होते,लढते आहे..
अस्तित्वाशी भांडते आहे,
लढून पुन्हा जिंकण्यासाठी..
नवा डाव मांडते आहे..!!

" घरटे.."


आपुले घरटे सख्या ते चन्द्रमौळी..
पावसातून कालच्या वाहून गेले,

सांधण्याचा डावही फ़सवा निघाला..
भग्न्न त्या खाणाखुणा पाहून गेले,

आसवानी कोरडा आकांत केला..
गोठल्या रक्तात मी नाहून गेले,

घाव जखमांचे उराशी साचलेले..
गंजल्या वज्रापरि साहून गेले,

मीच माझे एकटीने सोसले जे..
ते तुला सांगायचे राहून गेले...!!!

'नातं '......


WHAT IS LOVE....???
COMPROMISE.....OR CONTINOUS ADJUSTMENT...!!!
GOD KNOWS......................
BUT WHEN SOMEBODY IS IN 'LOVE'.... WANT TO MAINTAIN THEIR RELATIONSHIP IN THEIR OWN WAY...XPECTING A LOT FROM EACH OTHER.. !!!!
THEN.. WHAT 'HE' / 'SHE' MUST BE FEELING..

माझा काव्यप्रयास...त्या दोघांच्या शब्दात........


'' त्याचं '' मनोगत :-


गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस..!!!!


'' ती '' चं मनोगत


झालं तेवढं पुष्कळ झालं
आता आपण माघार घेऊ..
काही सवयी मागे ठेवून
आठवणींचा आधार घेऊ..

आपलं 'नातं ' कसलं होतं
ते कधीच कळणार नाही..
माझ्यापुरतं माझं मन
पुन्हा मागे वळणार नाही...

कित्येक रात्री जागून काढल्या
तुझ्या एका शब्दासाठी..
आता वाटतं उगाच घडल्या
तुझ्या माझ्या भेटीगाठी..

सारं काही विसरून जाणं
काही दिवस अवघड जाईल..
रितेपणात जगण्याची मग
पुन्हा एकदा सवय होईल..

सुरुवात तूच केलीस पण..
शेवट मात्रं मीच करेन
विसर विसर म्हटलं तरी
पुन्हा पुन्हा तुला स्मरेन्… !!!!

"वळण...."


तो मला भेटला त्या वळणावर
जिथे मला मी सावरताना..

केले त्याने मजला त्याचे
ओढ मनाची आवरताना..

तेच वळण तो रस्ता जेथे
धरती आकाशाला भेटे..

इन्द्रधनूवर स्वार होऊनी
वर्षाराणी गर्जत येते..

त्या वळणावर त्याचा-माझा
अबोल अवचित परिचय झाला..

ओळख नव्हती तरीही त्याचा
स्वर माझ्या ह्रदयाला भिडला..

स्वरात त्याच्या गुन्तवूनी मज
क्षणात मग तो मागे वळला..

ओढ लावूनी अंतरीची मज
माझ्या अश्रुतून ओघळला..

त्या सरलेल्या क्षणाबरोबर
अश्रुसुद्धा निसटून गेले..

दूर त्याच त्या वळणावरुनी
आठव होऊन परतून आले..

होऊन वारा पुन्हा पुन्हा तो
असाच मजला स्पर्शून जातो..

त्या वळणावर अस्तित्वाचा
थेंब होऊनी बरसत येतो..!!!!!!

श्वास काट्यांचा......


विस्कटलेल्या चित्रावरचे
विखुरलेले रंग
कुस्करलेल्या फ़ुलांमधला
घुसमटलेला गंध...

अंधारलेल्या वाटेवरची
गोंधळवणारी वळणे
संसाराचा दाह सोसून
चितेवरती जळणे...

सारं काही ओसाड
भग्न्न आणि भकास
रुक्ष वाळवंटात
एका निवडुंगाचा प्रवास...

तहान कोरडी त्याची
सवे तप्त उन्हाच्या ज्वाला
घेईल मोकळा श्वास कसा
काट्यांचे कुंपण त्याला...

काट्याने होती जखमा
काट्याने निघतो काटा
आयुष्याच्या वळणावर
काट्यांच्या पाऊलवाटा...

भरवसा कसा ठेवावा
जखमेने काट्यांवरती
जखमेतून विव्हळणार्‍या
अश्रूंच्या नात्यावरती...

जे मलाच ठाऊक नाही
ते तुला कसे सांगावे
उपभोगातून घडलेले
ते भोग कसे भोगावे...

जो प्रश्न निरुत्तर होता
तो सलतो आहे मनात
जो डाव मांडला होता
तो मोडून जाई क्षणात...

मग कशास जगणे आता
ते मरण अटळ येणार
स्वप्न्नील सुखाचा माझ्या
निष्पाप बळी घेणार...

पण रोज मरण भोगूनही
जग सारे जगते आहे
मृत्यूच आपला उघड्या
डोळ्यांनी बघते आहे...

तरीही जगण्याची आशा
मृत्यूचा केवळ भास
जगण्यास पुन्हा जन्मावे
घेऊन चिरंतन श्वास.......!!!!!

खंत...

मज काय मिळाले काय गमावून बसले
का हिशोब चुकला कधीच कळले नाही..

मी जमाखर्च मांडला चुकांचा पुन्हा
प्रारब्ध भोगल्यावाचून टळले नाही..

झेलल्या उरावर कित्येक जखमा हसूनी
पण नयनातून अश्रू ओघळले नाही..

मी ओंजळ होऊन तुझा सहारा झाले
तुज सावरले, ज्योतीसम जळले नाही..

पोळले हात सोसल्या तप्त मी ज्वाळा
मज खंत एक तव रक्त उसळले नाही..!!!

प्रयास...

तव आस अन्तरी, तुझा रेशमी भास
तू श्वास सुगन्धी, स्पर्श तुझा मधुमास

तू अबोल अवचित, साद मला घालावी
त्या मधुर स्वराची,मलाच ज्ञात मिठास

तू अधीर अलगद, तनूस स्पर्शून जावे
त्या क्षणिक सुखाचा, मनास या हव्यास

नि:शब्द तुझ्या प्रीतीत, गुन्तला जीव
मज प्राणाहूनही प्रिय तुझा सहवास

मम काव्यालाही तुझ्या स्मृतीन्चा गन्ध
तुज स्मरण्याचा हा, माझा खुळा प्रयास ..!!!!

"क्षितीज.."


क्षितीजावरती विखरुन गेले लाल केशरी रंग..
निळ्या आभाळावरी उमटले रुधिराचे तरंग..

क्षणात रजनी मावळली अन दिशा प्रकाशित झाल्या..
लगबग झाली सृष्टीची अरुणोदय समीप आला..

पायघड्या धरणीच्या आणिक सागर घाली स्न्नान..
प्रभात समयी वसुंधरेवर भूपाळीचे गान..

अर्घ्य म्हणून मग मीही माझे काव्य समर्पण केले..
काव्यामधल्या प्रतिभेला रवी चरणी अर्पण केले..

तेव्हापासून ओंजळीत तेजाची कवने झाली..
नव्या प्रभाती नवे काव्य रचण्याची उमेद आली..!!!

"बालपण...."

अजून वाटते कधीकधी की.. पुन्हा एकदा लहान व्हावे..
खोड्या काढून.. खाऊन रट्टा हळूच आईच्या कुशीत शिरावे..

बरसत येता टपटप पाऊस होड्या सोडत चिंब भिजावे..
पुन्हा नव्याने गोष्टी ऐकत आजीच्या पदरात निजावे..

पाहून दप्तर मित्राचे मी बाबांजवळी हट्ट करावा..
रुसून कोपर्‍यामध्ये बसूनी अबोल अट्टाहास धरावा..

भातुकलीच्या खेळामध्ये करुन जेवण व्हावे आई..
कधी तपासून जुन्या वह्यांना घेत हजेरी व्हावे बाई..

भावविश्व नाजूक निरागस दु:खाचा लवलेश नसावा..
गप्पा गोष्टी गाण्यांमधूनी स्वप्नांचा उन्मेष हसावा..

क्षण सारे ते निसटून गेले.. उरली केवळ एक आठवण,
तरीही उरतो प्रश्न अनामिक सरले कैसे माझे बालपण..

सवयीने मी आई आणिक बाबांना हा प्रश्न करावा..
पुन्हा लावूनी हात कपाळी त्यांनी माझा कान धरावा..

"यक्षप्रश्न हा अनुत्तरित जो उत्तर नाही कुणास अवगत..
जीवन अपुले ऋतूचक्रासम चालत राहते अखंड अविरत..

आयुष्यातील वसंत सरला.. बालपणातच.. समजून घ्यावे..
संस्कारांचा मोहोर जपण्या पुन्हा एकदा लहान व्हावे..
..........................................पुन्हा एकदा लहान व्हावे..!!!"

'' नकोच.. .. .."

नकोच आशा नको दिलासा
नको व्यथांचा रिता उमाळा..

नकोच वचने नको खुलासा
नको स्मृतींचा रुक्ष जिव्हाळा..

नकोच रुसवा नको बहाणा
नकोच फसवे शब्द लाघवी..

नकोच लटका राग शहाणा
नको बोलणे मृदु आर्जवी..

नकोच स्वप्ने नको कल्पना
नको अवास्तव वृथा अपेक्षा..

नकोच जखमा नको यातना
नकोच फुंकर नको प्रतिक्षा..

नकोच प्रीती नको वंचना
नकोच चिंतन जुन्या क्षणांचे..

नकोच नाती नको वल्गना
नकोच ओझे तुझ्या ऋणांचे..

नकोच कोणी नकोस 'तू' ही
नको नकोसा मलाच 'मी' ही..

तरी अखंडीत उरलो माझा
मीच एकटा विरक्त देही.. !! ......

'' शब्दबहर..."

आज खूप दिवसांनी शब्दांना पालवी फुटली
शब्दकळ्या शब्दफुले.. शब्द शब्द वेचत सुटली

शब्द अधीर शब्द बधीर शब्द मुळी सुचत नव्हते
सुचत होते शब्द जे.. ते मनापासून रुचत नव्हते

अखेर शब्द विरुन गेले ओठामागे काळोखात
पुन्हा सुरु पानझड मनामध्ये आतल्याआत

असंच होतं जेव्हा जेव्हा तुझी माझी भेट होते
शब्दामागून शब्द येतात वेळ मात्रं निघून जाते

सांगायचं असतं तुला तेच नेमकं राहून जातं
शब्दांना पूर येतो.. सुचलेलं वाहून जातं

शब्दांच्या ओघात असं.. शब्दांचं हसं होतं
काय सांगू कसं सांगू? कित्ती सांगू असं होतं

म्हणून सांगते.. ऐकशील का???

माझ्या एका शब्दाखातर स्वप्नामध्ये येशील का
मागायचं आहे तेच.. न मागता देशील का??

म्हणजे मन मोकळं होईल शब्द अडून राहणार नाहीत
तुझ्या एका शब्दासाठी.. तुझी वाट पाहणार नाहीत…!!!

'' जमेल ??? "

उदास वाटा , उदास वळणे;
वळणावरती उगाच वळणे..

आठवणींच्या उंबरठ्याशी..
पुन्हा पुन्हा माझे घुटमळंणे..

सरेल का ही पायपीट;
अन सुन्या सावल्यांपाठी पळणे..

निवांत मृत्यूशय्येवरती..
निपचित लाकूड होऊन जळणे..?

जमेल का मज कठोर होऊन
निर्जीव पाषाणासम जगणे..

त्रयस्थ दृष्टी ठेवून माझ्या
तटस्थ आयुष्याला बघणे..?

जमेल सारे .. जमेल तेव्हा..
सरेल अवघे माझे मीपण..

उरेन माझी मीच एकटी..
अन..
विवंचनांचे विशाल अंगण !!! ??

आयुष्यं . .''

घडले होते बरेच काही..
तरी नव्याने घडते आहे..
रोजच्याच त्या वाटेवरती..
पाऊल नकळत पडते आहे..

दिवस कालचा उगवून गेला..
रात्र पुन्हा मावळते आहे..
जुन्याच आशा.. नव्या उमेदी..
भविष्य चिंता छळते आहे..

गतकाळाच्या रम्य स्मृतींना..
पुन्हा उजाळा कशास देऊ..??
विसरु म्हणते झाले गेले..
चुकले तेव्हा कळते आहे..

भले जाहला उशीर थोडा..
वेळ जराशी निघून गेली..
अविचाराला सुधारण्याची.
नवीन संधी मिळते आहे..

म्हणून आता जगेन म्हणते..
व्यवहारी अन विरक्त होऊन..
आता कुठेसे आयुष्याशी..
सशक्त नाते जुळते आहे... !!!