Sunday, January 11, 2009

गणित !!!


तसा माझा गणिताशी .. पूर्वीपासूनच ३६ चा आकडा..
म्हणूनच की काय..आयुष्याचं गणितसुद्धा सुटता सुटलं नाही..
उणे अधिक करत जुळलेल्या नात्यांत..आपलं म्हणावं असं कुणी भेटलं नाही..
पुन्हा म्हणून पाहीला.. आयुष्याचा पाढा..पुन्हा मोजून काढल्या गतकाळाच्या चुका..
पण त्या एकसूरी गणिताच्या गाण्याला..नव्हता शाश्वत तालाचा ठेका..!
सगळीच समीकरणं क्षणिक होती..पण विचार करायला लावणारी..
आकडेमोडही बरीच होती..दहा बोटांत न मावणारी..!
पण मी मोजत गेले सरसकट..कधी बरोबर.. तर कधी चुकत चुकत..
एखाद दुसरे हातचे सोडले तर..सगळीच बाकी शून्य होती..
आणि बाकी धरून गणती केली..तरी सारी हयात नगण्य होती..
असं आयुष्याचं क्लीष्ट गणित.. काही केल्या सुटलं नाही..
संदेहाचा कलह सुरूच्..वादळ काही मिटलं नाही..
हातावरच्या भाग्यरेषा.. फक्त सोबत पुसत गेल्या..
अन वर्ष वजा होता होता.. काही ओळी सुचत गेल्या..
घडली कविता.. भिडले शब्द.. जुळून आला ताळमेळ..
आयुष्याचं गणितच अजब.. पण सरावाचा झालाय खेळ..!!!

मौन..!!!


बोलायाचे नव्हते काही..
पण मौन पाळता आले नाही..
शब्दच वेडे फितुर होते..
की अश्रू गिळता आले नाही..

तुझी ओळख पटते तेव्हाच
परकेपणा बोलका होतो..
पण संवादाची ओढ अजब
बोलणे टाळता आले नाही..

आजसुद्धा रोजच्यासारखे
कुलुपबंद ओठ होते..
पण निर्विकार चेहरा ठेवून
हास्य गाळता आले नाही..

अन दोन शब्द तुझे जेव्हा
अवचित आले कानावर..
तोच सार्‍या अटी विलग करून..
दूर पळता आले नाही..

पुन्हा पुढल्या शब्दासाठी..
वाट पाहणे मंजूर होते..
शब्दांचीच चाकरी बरी..
शून्यात वळता आले नाही..!!!

Thursday, January 8, 2009

संकल्प !!!


अनभिषिक्त मी सम्राट जगाचा झालो
तर करेन होळी भ्रष्ट दुष्ट कर्माची..
तळहातावरती जपेन दीन प्रजेला
अन भरेन झोळी सत्वशील धर्माची..

रक्तातच असते वेड गगनभेटीचे..
पंखांची किमया यात जराही नाही...
गरुडाचे छाटून पंख लाव घुबडाला..
ती झेप विलक्षण तयास जमणे नाही..

मी सत्य जाणतो.. तत्वाचे सत्वाचे..
ना कुणा शक्य ही कर्तृत्वाची उधारी..
ते रक्त घेऊनी आलो मी जन्मास..
मज गगन थिटे घेण्यास विमुक्त भरारी..

मी करेन कायापालट या विश्वाचा..
विश्वास असा दृढ सदैव माझ्या चित्ती..
संकल्प जुने ते झाले गेले सारे..
सिद्धीस नव्याने नेण्याची मम वृत्ती..

सरत्या वर्षाच्या सवे त्रुटीही सरल्या..
पण अटींस मी बांधील राहीलो नाही..
मी गुढी उभारुन संकल्पांची सज्ज..
पण पूर्णत्वाचा धनी जाहलो नाही..

या नव्या पहाटे पुन्हा नवा संकल्प..
मी नव्या दमाने करतो आहे पुन्हा..
स्वप्नांना द्यावी जरा कृतीने जोड..
या हट्टासाठी झटतो आहे पुन्हा..

संकल्प नसे हा माझा.. सर्वांचा तो..
पुर्तता तयाची व्हावी हीच सदीच्छा..
जिंकून मने सर्वांची.. व्हा सम्राट..
या सम्रटाची हीच तुम्हा शुभेच्छा.. !!!

Wednesday, December 24, 2008

सोबत..!!


जेव्हा वाटतं की..... तू असावस जवळ.. घटकाभर
आणि ओळखावास.. व्यथांनी भिजलेला माझा हळवा स्वर..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!

जेव्हा वाटतं की..... तू समजून घ्यावस सारं काही..
जाणावस नजरेतूनच.. अव्यक्त शब्दांनाही..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!

जेव्हा वाटतं की..... तू ऐकावीस माझी कविता..
अगदी मुग्ध होऊन..
आणि करावस प्रतिभेला प्रेरीत.. मोकळी दाद देऊन..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!

जेव्हा वाटतं की..... तुझी उणीव अगदी असह्य होतेय..
क्षण न क्षण सुना भासतो..
नेमकं तेव्हाच .. जे जे वाटतं ते ते सारं शब्दरूप होतं..
कवितेतून..
मन हलकं होतं.. व्यथा बोलक्या होतात..
जाणीवांना जाग येते..
नव्हे.. जाणीवांची जाणीव होते..
पण तरीही मन खंतावतच...
कारण..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!

Thursday, December 18, 2008

" उंबरठा...!!!"


स्त्री तर केव्हाच उंबरठ्याबाहेर पडलीय..
आत्ताची career woman तारेवरची कसरत करत संसार सांभाळते.. आणि
कधी कधी अपेक्षाभंग झाला की.. तितक्याच सहजतेने काडीमोड.. हा पर्याय ही स्वीकारते..!
Divorce हा शब्दं कित्ती सर्रास उच्चारला जातो ना आजच्या पिढीकडून.. असं जर कुण्या बुजुर्गांनी म्हटलं.. तर काय चुकलं..!
उंबरठ्याच्या आतली मर्यादा.. आणि बाहेरच्या विश्वाचा खरा ताळमेळ जिला साधता आला.. ती खरी "स्त्री"...!!
सध्या TV वरच्या किरन बेदींच्या "आप की कचहरी" या मालिकेला बघताना सुचलं ते हे दीर्घकाव्य..!! या सद्यस्थिती वर सल्ला देणारं भाष्य करण्याचा.. अननुभवी व्यक्तीचा हा प्रयत्न.. थोडासा लांबलेला.. पण सुसह्य ठरावा.. हीच आशा..

" उंबरठा...!!!"

अजूनही उंबरठ्याशी घुटमळतायत.. माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा..
सांगतायत मला .. घे माघार.. नको हा प्रयत्न केविलवाणा..!

वृंदावनात उभी तुळस.. सांगत होती मागे सर..
तुला हवय .. तस्संच घडेल.. फक्त थोडा धीर धर..

घरट्यामधल्या पिल्लांसाठी चिमणचारा कोण देईल..?
पंखांमध्ये बळ कुठेय.. कणखर बाणा कसा होईल..??

काडी काडी जमवलेल्या.. घरट्यामध्ये घरपण नाही..?
विश्वासाच्या भक्कम भिंती.. वात्सल्याचं अंगण नाही..?

ऐक माझं .. विचार कर.. पिल्लांसाठी मागे सर...
अस्तित्वाची आशा नको.. कर्तव्याची कास धर..!!

मोडायचाच होता डाव.. तर मांडला तरी कशासाठी..?
तोडायचे सारे बंध.. तुटपुंज्या यशापाठी..?

पटतय का तुला तरी..तुझे विचार.. तुझं वागणं..
जबाबदारी टाळून असं.. अस्तित्वाशी लढत जगणं..?

त्याला तू कळलीच नाहीस.. ही त्याची हार आहे..
पण जिंकण्याचा हट्ट म्हणजे.. व्यर्थ अविचार आहे..

म्हणून म्हणते ऐक माझं.. वळ मागे.. सांभाळ घर..
जप नातं जाणीवांचं.. पुन्हा एकदा विचार कर..!!

उंबरठ्याच्या आत असेल.. भावनांचा कोंडमारा..
पण.. विस्कटलेल्या जगापेक्षा.. नक्कीच बरा तो पसारा..

बंधन म्हणून पाहीलस तर.. स्वातंत्र्याचा प्रश्न उठेल..
मर्यादेची जाणीव जप.. सगळं कोडं सहज सुटेल..!!

जग चार भिंतींमधलं.. समाधानात तोलून बघ..
कुठेतरी तडजोड असेल.. तेही घाव झेलून बघ..

तोडणं खूप सोपं असतं.. जोडणं अवघड करून नकोस..
जाणीवपूर्वक नातं जप.. व्यवहार मनात धरू नकोस..

काही गणितं चुकत जातात.. बाकी काहीच उरत नाही..
हातचे कितीही धरले तरी... झोळी फाटकी भरत नाही..

म्हणून फक्त लक्षात ठेव.. "काडीमोड" करू नकोस..
जगण्याच्या या स्पर्धेमधून.. माघारी तू फिरू नकोस..!!!

Monday, December 15, 2008

शहाणा विचार..


नको गुंतुस गं वेडे..
जीव लावून जीवाला..
सार्‍या आशा- आकांक्षांचा..
स्वैर सोडून हवाला..

भावभावनांचे धागे..
तुझ्या आर्जवांच्या मागे..
गेले विणत विणत..
मुक्या मायेचा जिव्हाळा..

जिथं आभाळंही थिटे..
असे शब्द शब्द खोटे..
सांग कशाला जपावा..
अशा नात्याचा उमाळा ..

तुझ्या आसवांचे मोल..
ज्याला कळलेच नाही..
अशा पाषाण हृदयी..
केला अभिषेक ओला..

हुरहुर कुणासाठी..
ज्याला झुरण्याचा शाप..
अगतिक जाणीवांचा..
जिथे उहापोह झाला..

एक शहाणा विचार..
कर आता तरी वेडे..
व्यवहार भावनांचा..
कुणी स्वार्थासाठी केला..

आता विसर विसर..
झाले गेले सारे जुने..
उणे नव्हतेच काही..
असा देऊन हवाला..!!

Friday, December 12, 2008

THANKS..!!


आज मी खर्‍या अर्थाने शहाणी झाले...
आणि तुझ्यापासून पूर्णतः वेगळी..
आता कुठलेच किंतु परंतु नाहीत..
गाढ निद्रेतून ..
नव्हे .. पोकळ स्वप्नातून जागी झाले..
THANKS..
मला जागवल्याबद्दल... !!

काही आभास आयुष्याला तेजाचं वलय देतात..
काही आवाज .. भविष्याला.. पंखांचं बळ देतात..
तुझा आवाज.. आणि तुझं अस्तित्व ..
दोन्ही अनाकलनीय होतं..
नव्हे . क्षणभंगुर होतं..
THANKS..
आज ते जाणवल्याबद्दल.. !!

जशा आठवणी शाश्वत असतात..
तसेच आघातही बोथट होत जातात..
शंभर खुलासे.. आणि दोन चार दिलासे..
इतकाच असतो आपला प्रवास..
THANKS..
आज तोही संपवल्याबद्दल.. !!

आजची "मी" .. आणि कालची "मी"..
यात फरक इतकाच आहे की..
कालचे "आपण".. आज "आपण" राहीलो नाही..
आपापल्या वाटेवर.. आपापल्या विश्वात..
स्वतःपासून पूर्णतः वेगळे होऊन सुद्धा..
परिपूर्ण असल्याचा सा़क्षात्कार घडवून देतात..
ते आपले विचार..
ती आपली कृती..
आणि..
तो आपला 'नकार' ...
THANKS..
तो उच्चारल्याबद्दल... !!!