Sunday, February 3, 2008

ध्यास..


पूर्णतेचा ध्यास कायम असला तरी..
स्वप्नांच्या व्यथा अधुर्‍याच राहतात..
कक्षेच्या बाहेर अपेक्षा रुंदावतात..आणि
जीवनाच्या कथा अपुर्‍याच राहतात..

लिहायचं असतं खूप काही..
आयुष्य अधोरेखीत करेल असं..
पुसायचं नसतंच.. कधीच नाही..
रेखायचं चिरंतन ठरेल असं..

पण.. नव्याने डाव मांडता मांडता..
जुने ते घाव तसेच राहतात..
जिंकण्याचा हट्ट करता करता..
हरण्याचा सराव करुन पाहतात..!!!

माझं मन...


माझं मन मोकळं होतं..
फक्तं माझ्या मनाकडे..
तेच ऐकून घेतं माझे
शब्द भोळे भाबडे..

मनामधलं मनापासून
मनालाच सांगते मी..
विचारांचा अभिप्राय
मनाकडे मागते मी..

मग मन जरा गंभीर होतं..
विचार करु लागतं..
कधीतरीच वेडं मन
शहाण्यासारखं वागतं..

चंचल आहे अल्लड मन..
मला पक्क ठाऊक आहे..
माझ्यापेक्षा माझं मनच ..
हळवं आणि भावूक आहे..

मन सोबत आहे म्हणूनच
एकटेपणाला अर्थ आहे..
मनाशिवाय भावनेचं
जगणं सुद्धा व्यर्थ आहे !!!!

Friday, February 1, 2008

स्वप्नं ...


जागृत नयनी स्वप्नं पाहते..
स्वप्नांचा मज छंद..
उभ्या जीवनी कधी मिळेना..
पूर्तीचा आनंद..

स्वप्नंफुलातील मधुकण वेचे..
मनातला मकरंद..
या पुष्पातून ..त्या पुष्पावर..
स्वप्नकळ्यांचा गंध..

भ्रमरछंदी मन कधी न टिकले..
एका स्वप्नं फुलावर..
स्वप्नसडा जो विखरुन गेला..
हुंगण्यास तो अनावर..

त्या स्वप्नांची अवीट गोडी..
अलौकीक माधुरी..
पूर्णत्वातील स्वप्ने काही ..
काही स्वप्ने अधुरी..

जरी अधुरी जीर्ण पुराणी
तरी तराणे नवे..
उमेद इच्छा सबुरी..
आणिक आकांक्षांच्या सवे..

अपूर्णतेचा शोध लावण्या..
मी ही मिलिंद व्हावे..
लाभून तृप्ती स्वप्नपूर्तीची..
सौख्ये विलीन व्हावे..!!!

Monday, January 28, 2008

कशाला ???


विसरायाचे आहे सारे स्मरु कशाला.. ??
आठवणींच्या रिक्त पोकळ्या.. भरु कशाला ..??

घडून गेले बरेच ... तरीही घडते आहे...
गतकाळाच्या सुप्त सावल्या... धरु कशाला..??

कळले जेव्हा चुकले.. तेव्हा शहाणी झाले..
व्यर्थ चुकांचे हिशोब पुन्हा.. करु कशाला..??

स्वैर मनाचे विचार आता.. जाणीन म्हणते..
चाकोरीतील सक्त बंधने.. धरु कशाला..??

आता कुठेशी धडपडते..मी जगण्यासाठी..
घटका घटका श्वास मोजुनी.. मरु कशाला..??

Tuesday, January 22, 2008

प्रवास...


नव्हते सवे कुणीही ... एकांतवास होता..
मी चालले तरीही .. तोही प्रवास होता..

होतास सोबतीला होऊन सावली तू..
तेव्हा कुठे कळ्यांच्या गात्री सुवास होता..

आता फुले कळ्यांची आहेत ओंजळीशी..
पण गंध वेचणारा तो ''तू'' हवास होता..

गंधातला बिलोरी तो स्पर्श आज नाही...
साराच प्राक्तनाचा.. फसवा आभास होता...

काटेच आज माझ्या वाटेत सांडलेले..
व्हावा सराव त्यांचा इतुका प्रयास होता...!!!!!!!

Monday, January 21, 2008

'' तेव्हापासून......''


नव्हती जेव्हा तुझी नि माझी ओळख साधी..
संवादाची वृथा अपेक्षा प्रश्नाआधी..
तेव्हापासून खोल मनाच्या गाभार्‍याशी..
तुझ्या स्मृतींच्या सवे घ्यायची नित्य समाधी..

तेव्हापासून जडली बाधा आठवण्याची..
पुन्हा मनाला मागे मागे पाठवण्याची..
शब्दफुलांचे असंख्य झेले.. अनंत आशा..
मुठीत काही मिठीत थोडे साठवण्याची..

तेव्हापासून फ़ितुर झाले श्वास बिलंदर..
तेव्हापासून उरले नाही..दूरात अंतर..
शब्द लाघवी जुळले.. आणिक घडली कविता..
रुळू लागले ओठावरती..गीत परस्पर...

तू नजरेने सांग एकदा माझ्यासाठी
जुळतील का रे.. तुझ्या नि माझ्या रेशीमगाठी..
तुझेच व्हावे मीपण तेव्हा सर्वस्वाने..
विसरून माझे 'मी' पण अवघे तुझ्याच साठी..

असे घडावे तसे घडावे.. घडेल का रे?
माझ्यावाचून काही तुझेही अडेल का रे
तेव्हापासून त्या सरलेल्या.. क्षणाक्षणाला..
स्मरण्याचे हे वेड तुलाही जडेल का रे..??

काय खुळी मी विचारते बघ भलते सलते...
नाहीच काही तसे मलाही अचूक कळते..
उगीच वेड्या आशेवरती माझ्या नकळत..
अल्लड पाऊल पुन्हा पुन्हा त्या तिथेच वळते..

अपुल्यामधले किंतु परंतु सरतील जेव्हा..
जरतारीच्या रिक्त पोकळ्या भरतील तेव्हा..
उपचाराचे रूक्ष बोलणे सोड अन्यथा...
आठवणींचे हिशोब केवळ उरतील तेव्हा..

नकोच गुंता नात्यांचा ती व्यर्थ मुजोरी..
नकोस तोलू शब्दांमधले अर्थ दुहेरी..
मित्रत्वाची अवीट गोडी ओढ चिरंतन..
अखंड राहो पावित्र्याचा बंध रुपेरी..

तेव्हापासून असेच काही स्मरते.. झुरते..
नित्य उशाशी अश्रू.. आणिक मनात सल ते..
किती ठरवते विसरून सारे पुन्हा नव्याने..
जगण्याचा मी केविलवाणा प्रयत्न करते..

अखेर माझ्या नकळत मजला.. गुपित कळते..
शून्यामधल्या घरट्यासाठी वणवण फिरते..
तेव्हापासून... माझी प्रतिभा .... अलिप्त.... निश्चल..
म्हणून माझी कविता.. कायम अपूर्ण उरते............ !!!