
काळोखाचा भास आहे..
अस्तित्वाचं वलय नाही..
चैतन्याचा वास आहे..
जळणं जीचं स्वाभाविक...
समईचा जो श्र्वास आहे..
जळून जग उजळवण्याचा
ज्योतीचा प्रयास आहे !!! :)
ज्या वळणावरती भेट आपुली, तिथे तुझा मी निरोप घ्यावा.. तू मला पाहता मागे वळूनी..सुसह्य होई सख्या दुरावा..!

शब्द भिडायला.. कविता घडावीच लागते असं नाही..
कधी कधी साधं वाक्यंही सांगून जातं खूप काही...!!
मग तो शब्दातला उकार असो... अर्थातला नकार असो..
वेदनेचा हुंकार असो.. भावनेचा झंकार असो..
असण्या-नसण्याच्या परिसीमा ओलांडून..
व्यक्त व्हायला पुरेसं माध्यम असतं तेही..
कधी कधी साधं वाक्यंही सांगून जातं खूप काही...!!
ती 'हो' म्हणाली.. तर मुठीत स्वर्ग मावेनासा होतो..
तो 'नाही' म्हणाला तर.. तिचा जीव कासावीस होतो..
एका शब्दात इतकी किमया घडू शकते..
तर कशाला हवी.. शाई..लेखणी अन वही..
कधी कधी साधं वाक्यंही सांगून जातं खूप काही...!!
फक्त उच्चारण्याचा अवकाश असतो.. जे हवं.. ते.. हवं तेव्हा..
वेळ निघून गेली की.. बदलतात संदर्भ... मग वाटतो.. नियतीचा हेवा..
दिलं- घेतलं.. इतकाच असतो का ? कुठल्याही नात्याचा अर्थ..
की वेळेनुसार आपणही साधायचा आपला आपलाच स्वार्थ?
गरज म्हणून बघण्यापेक्षा आधार बनून जग..
गप्प बसून झुरण्यापेक्षा व्यक्त होऊन बघ..
अंतरातून उच्चारलेल्या शब्दाला मोल नाही..
कधी कधी साधं वाक्यंही सांगून जातं खूप काही...!!!!!
