
स्त्री तर केव्हाच उंबरठ्याबाहेर पडलीय..
आत्ताची career woman तारेवरची कसरत करत संसार सांभाळते.. आणि
कधी कधी अपेक्षाभंग झाला की.. तितक्याच सहजतेने काडीमोड.. हा पर्याय ही स्वीकारते..!
Divorce हा शब्दं कित्ती सर्रास उच्चारला जातो ना आजच्या पिढीकडून.. असं जर कुण्या बुजुर्गांनी म्हटलं.. तर काय चुकलं..!
उंबरठ्याच्या आतली मर्यादा.. आणि बाहेरच्या विश्वाचा खरा ताळमेळ जिला साधता आला.. ती खरी "स्त्री"...!!
सध्या TV वरच्या किरन बेदींच्या "आप की कचहरी" या मालिकेला बघताना सुचलं ते हे दीर्घकाव्य..!! या सद्यस्थिती वर सल्ला देणारं भाष्य करण्याचा.. अननुभवी व्यक्तीचा हा प्रयत्न.. थोडासा लांबलेला.. पण सुसह्य ठरावा.. हीच आशा..
" उंबरठा...!!!"
अजूनही उंबरठ्याशी घुटमळतायत.. माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा..
सांगतायत मला .. घे माघार.. नको हा प्रयत्न केविलवाणा..!
वृंदावनात उभी तुळस.. सांगत होती मागे सर..
तुला हवय .. तस्संच घडेल.. फक्त थोडा धीर धर..
घरट्यामधल्या पिल्लांसाठी चिमणचारा कोण देईल..?
पंखांमध्ये बळ कुठेय.. कणखर बाणा कसा होईल..??
काडी काडी जमवलेल्या.. घरट्यामध्ये घरपण नाही..?
विश्वासाच्या भक्कम भिंती.. वात्सल्याचं अंगण नाही..?
ऐक माझं .. विचार कर.. पिल्लांसाठी मागे सर...
अस्तित्वाची आशा नको.. कर्तव्याची कास धर..!!
मोडायचाच होता डाव.. तर मांडला तरी कशासाठी..?
तोडायचे सारे बंध.. तुटपुंज्या यशापाठी..?
पटतय का तुला तरी..तुझे विचार.. तुझं वागणं..
जबाबदारी टाळून असं.. अस्तित्वाशी लढत जगणं..?
त्याला तू कळलीच नाहीस.. ही त्याची हार आहे..
पण जिंकण्याचा हट्ट म्हणजे.. व्यर्थ अविचार आहे..
म्हणून म्हणते ऐक माझं.. वळ मागे.. सांभाळ घर..
जप नातं जाणीवांचं.. पुन्हा एकदा विचार कर..!!
उंबरठ्याच्या आत असेल.. भावनांचा कोंडमारा..
पण.. विस्कटलेल्या जगापेक्षा.. नक्कीच बरा तो पसारा..
बंधन म्हणून पाहीलस तर.. स्वातंत्र्याचा प्रश्न उठेल..
मर्यादेची जाणीव जप.. सगळं कोडं सहज सुटेल..!!
जग चार भिंतींमधलं.. समाधानात तोलून बघ..
कुठेतरी तडजोड असेल.. तेही घाव झेलून बघ..
तोडणं खूप सोपं असतं.. जोडणं अवघड करून नकोस..
जाणीवपूर्वक नातं जप.. व्यवहार मनात धरू नकोस..
काही गणितं चुकत जातात.. बाकी काहीच उरत नाही..
हातचे कितीही धरले तरी... झोळी फाटकी भरत नाही..
म्हणून फक्त लक्षात ठेव.. "काडीमोड" करू नकोस..
जगण्याच्या या स्पर्धेमधून.. माघारी तू फिरू नकोस..!!!