
स्वप्न पाहायची जशी सवय होते..
तसं वास्तवाचं भान विरुन जातं..
कुणी आयुष्यं जगायची वाट पाहतात..तर..
कुणाचं आयुष्यच वाट पाहण्यात सरुन जातं..
जिथे सुखाची परिभाषाच नाही..
तिथे दु:खावर शोक कशाला..?
आंधळा ही न बघता वाचणं जाणतो..
मग दृष्टीला तृप्तीचा लोभ कशाला..?
ऐकून सोडणं जर जमलं असतं.. तर
शब्द काळजाला भिडलेच नसते..
आणि नसतेच भिडले शब्द तरी..
पाऊल कुणासाठी अडलेच असते..!!
अशी दुनिया गोल आहे म्हटल्यावर...
पुन्हा भेटणं साहजिक आहे..
मग टाळता आलंच तर.. मला टाळ..
कारण मी कितीही दूर तरी नजिक आहे..
ते अंतर स्वप्न आणि वास्तवातलं..
मला सत्याची जाणीव करुन जातं...
मग वाट कितीही जवळची असली तरी..
आयुष्यच वाट पाहण्यात सरुन जातं..
मग वाट कितीही जवळची असली तरी..
आयुष्यच वाट पाहण्यात सरुन जातं..




